मित्र पक्षांशी समन्वय ठेवून विकासाचा मार्ग स्वीकारू : संतोष परीहार…
चिखली (एकनाथ माळेकर)महायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठे योगदान दिले असून आगामी काळात मित्र पक्षांशी समन्वय साधत लोकहिताची आणि विकासाभिमुख कामे पुढे नेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष परीहार यांनी केले.स्थानिक स्वरांजली हॉटेल येथे शुक्रवारी दि. २२ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करणे, बूथ प्रतिनिधी नियुक्ती, शाखा विस्तार तसेच आगामी राजकीय रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी विधानसभा अध्यक्ष मनोज दांडगे, जिल्हा उपाध्यक्ष विजय अंभोरे, राष्ट्रवादी नेते दत्ताभाऊ खरात, युवा नेते शेखर बोंद्रे, रुपेश रिंढे, रुपेश गवई, उमेश राठोड, सुनील सुरडकर, विलास वसु, राजेंद्र सुरडकर, प्रशांत जिने, विशाल थुट्टे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीदरम्यान तालुक्यात विकासकामांना गती देण्यासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी मित्र पक्षांशी सुसंवाद व समन्वय राखण्याची भूमिका मांडण्यात आली. तसेच लवकरच तालुकास्तरीय मेळावा घेण्याचाही निर्णय बैठकीत चर्चिला गेला.कार्यकर्त्यांनी गावपातळीवर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. चिखली आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी मित्र पक्षांमध्ये राजकीय स्पर्धा सुरू असताना संतोष परीहार यांनी मांडलेली “समन्वय आणि विकास” ही भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.संघर्षाऐवजी विकास आणि लोकहिताचा मुद्दा पुढे करत राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यात सकारात्मक राजकीय संदेश दिल्याची चर्चा राजकीय स्तरावर सुरू आहे.
