डिझेल न मिळाल्यास शेतकरी शेती पेरणार नाही; शेतकरी संघटनेचा इशारापेट्रोल-डिझेलऐवजी इथेनॉल व बायोडिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी…

0
IMG-20260519-WA0009

चिखली (एकनाथ माळेकर) – खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यात खतांसह डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली असून, शेतकऱ्यांना वेळेवर डिझेल उपलब्ध न झाल्यास यंदा शेती पेरणार नसल्याचा इशारा जिल्हा शेतकरी संघटनेने दिला आहे. या मागण्यांसाठी सोमवारी (दि. १८ मे) तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारामार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले.जिल्हाध्यक्ष देवीदास किसनराव कणखर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हातात डिझेलच्या कॅन घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना यांत्रिक शेतीसाठी प्रोत्साहन दिल्यानंतर ट्रॅक्टर व कृषी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे पेट्रोल-डिझेलची गरजही वाढल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.सध्या जिल्ह्यात खतांसह इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकऱ्यांना डिझेलसाठी पेट्रोलपंपांवर हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यास परवानगी द्यावी, जेणेकरून ट्रॅक्टर शेतातून पेट्रोलपंपावर नेण्याचा वेळ आणि खर्च वाचेल, अशी मागणी संघटनेने केली.पूर्वी बैलांच्या साहाय्याने शेती होत असल्याने इंधनावरील अवलंबित्व कमी होते. मात्र आधुनिक शेतीमुळे इंधनाशिवाय शेती करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल व बायोडिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.देशात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ऊस उत्पादनातून इथेनॉल तयार होऊ शकते, तर इतर जैविक स्त्रोतांपासून बायोडिझेल निर्मिती शक्य आहे. शेतकऱ्यांना कमी दरात पर्यायी इंधन उपलब्ध झाल्यास शेतीचा खर्च कमी होईल तसेच परदेशातून होणारी इंधन आयात कमी होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल, असे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.शासनाने शेतीसाठी इथेनॉल, बायोगॅस व बायोडिझेल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात. नैसर्गिक शेतीसोबतच पर्यावरणपूरक यांत्रिक शेतीलाही चालना द्यावी तसेच रासायनिक खतांप्रमाणे इंधनावरही अनुदानाचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक तीव्र होईल, असा इशाराही संघटनेने दिला.या मोर्चात देवीदास कणखर, एकनाथ पाटील, भीका पाटील, खुशालराव पाटील, अच्युतराव पाटील, गणेश थुट्टे, मुरलीधर येवले, दिनकर घुबे, राजू शेटे, प्रकाश घुबे, भागवत थुट्टे, गजानन घुबे, दीपक घुबे, परमेश्वर घुबे, रामेश्वर अंभोरे, भागवत नरवाडे, आत्माराम गाडे, संतोष शेळके, रामदास शेळके, श्रीधर थुट्टे, शरद थुट्टे, संदीप थुट्टे, श्रीकृष्ण थुट्टे, सागर कव्हळे, संतोष शेरे, समाधान थुट्टे, केशव थुट्टे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!