संतोष आघावांचा महावितरणला इशारादोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करा; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन….
लोणार(रघुनाथ आघाव) महावितरणच्या किनगाव जट्टू विद्युत केंद्रांतर्गत येणाऱ्या वझर आघाव गावात मागील आठ ते दहा दिवसांपासून वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उकाड्यात नागरिकांना होत असलेल्या हालअपेष्टांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) लोणार तालुका युवा सेना उपप्रमुख तथा तालुका संघटक संतोष उर्फ पिंटूभाऊ आघाव यांनी महावितरण प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. “येत्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर शिवसेना आपल्या शैलीत तीव्र आंदोलन उभारेल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.सध्या परिसरातील तापमान चाळीस ते पंचेचाळीस अंशांच्या दरम्यान पोहोचले असून प्रचंड उकाड्यामुळे नागरिक आधीच हैराण झाले आहेत. अशातच सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गावकऱ्यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. दिवसभर वारंवार वीज जाणे, रात्री अचानक अंधार होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे आणि अनेक वेळा तासन्तास वीज गायब राहणे, यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध, आजारी नागरिक तसेच दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. उष्णतेमुळे अनेकांना रात्रभर झोप लागत नसून घरामध्ये असह्य वातावरण निर्माण झाले आहे. काही घरांमध्ये पंखे, कुलर बंद असल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत.गावात पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाण्याच्या मोटारी सुरू होत नाहीत. त्यामुळे महिलांना आणि नागरिकांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. तसेच घरगुती उपकरणे बंद पडण्याची भीतीही ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मागील अनेक दिवसांपासून ही समस्या कायम असून महावितरण प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. काही वेळा तात्पुरती दुरुस्ती केली जाते; मात्र काही तासांत पुन्हा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.यासंदर्भात संतोष उर्फ पिंटूभाऊ आघाव यांनी महावितरण प्रशासनावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “वीज ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. एवढ्या उकाड्यात नागरिकांना अंधारात ठेवणे हा महावितरणचा निष्काळजीपणा आहे. नागरिकांना होणारा त्रास शिवसेना कदापी सहन करणार नाही. दोन दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने गावात भेट देऊन तांत्रिक बिघाड दूर करावा, नियमित व सुरळीत वीजपुरवठा सुरू करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.दरम्यान, शिवसेनेच्या या इशाऱ्यानंतर महावितरण प्रशासन कोणती भूमिका घेते आणि नागरिकांच्या समस्येवर कितपत तत्परतेने उपाययोजना करते, याकडे आता वझर आघाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
