चिखली शहरात ‘अंगीकार अभियान-2025’ ला उत्स्फूर्त प्रतिसादगरजू कुटुंबांना मिळणार हक्काचे घर – आ. श्वेता ताई महाले पाटील यांचे मार्गदर्शन…..
चिखली( निलेश कोल्हे)
चिखली शहरातील प्रत्येक गरजू कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, त्यांचे स्वप्नातील घरकुल पूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत ‘अंगीकार अभियान-2025’ चा शुभारंभ चिखली नगर परिषदेमार्फत करण्यात आला. या अभियानाचा उद्देश जास्तीत जास्त गरजू नागरिकांपर्यंत या योजनेची माहिती पोहचवणे व लाभ मिळवून देणे हा असून, या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानाचे उद्घाटन करताना चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता ताई महाले पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की –
“हक्काचे घर हे केवळ चार भिंती नसून, ते प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न, सुरक्षिततेचे ठिकाण आणि पुढील पिढ्यांसाठी वारसा आहे. गरीब व मध्यमवर्गीयांच्या डोळ्यांतील हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 सुरू केली असून ‘अंगीकार अभियान-2025’ हे त्याचे मूळ अधिष्ठान आहे. यातून लाभार्थ्यांना केवळ घरकुलच नाही, तर नियमानुसार जमीन व कायदेशीर सुरक्षितता देखील मिळणार आहे.”
आ. श्वेता ताईंनी यावेळी भावनिक शब्दांत जनतेशी संवाद साधत म्हटले की,
“प्रत्येक आई-वडिलांना आपल्या लेकरांसाठी डोक्यावर छप्पर असावे असे वाटते. हीच भावना लक्षात घेऊन आम्ही प्रयत्नशील आहोत. या योजनेतून आपल्याला योग्य कागदपत्रांची पूर्तता करून दिली जाईल, हक्काची नोंदणी करून दिली जाईल व भविष्यात कोणत्याही अडचणीशिवाय घराचा अधिकार लाभेल. गरीब, शेतकरी, कामगार, महिलावर्ग व शहरातील भटक्या-व्यवसायिक वर्गासाठी ही योजना वरदान ठरणार आहे.”
या अभियानामुळे चिखली शहरातील हजारो लाभार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले असून, प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळत आहे. शहरातील नागरिकांचा विश्वास आणि समाधान हेच या अभियानाचे यश असल्याचे मत आमदार श्वेता ताईंनी व्यक्त केले.
या प्रसंगी मुख्याधिकारी श्री. प्रशांतजी बीडकर, श्री. पंडितदादा देशमुख, श्री. सुहासजी शेटे, श्री. रामदासभाऊ देव्हढे, उपजिल्हा प्रमुख श्री. शिवाजीबापू देशमुख, भाजपा शहराध्यक्ष श्री. सागरजी पुरोहित, किसान आघाडी शहराध्यक्ष श्री. प्रशांत देशमुख, शिवसेना शहर प्रमुख श्री. विलासजी घोलप, श्री. शेख अनिसभाई, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री. शैलेश देशमुख, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री. विजय वाळेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध विभागातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 व ‘अंगीकार अभियान’ संदर्भात माहिती देत लाभार्थ्यांना जागरूक केले.
