तहसीलदार अजित दिवटे यांना निवेदन देतांना शिवराज कायंदे यांच्यासह शेतकरी बांधव
सिंदखेडराजा तालुक्यात मुसळधार पावसाचा फटका :रूम्हणा, तांदुळवाडी, जांभोरा परिसरातील शेतमालाचे मोठे नुकसान; पंचनाम्याची मागणी
सिंदखेडराजा (अनिल दराडे)सिंदखेडराजा तालुक्यातील रूम्हणा, तांदुळवाडी, सोयंदेव, जांभोरा, देवखेड,पांगरी उगले,किनगावराजा व आजूबाजूच्या परिसरात, गावात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अनियमित पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर तसेच फळबाग यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतजमिनींमध्ये पाणी साचल्यामुळे पिके सडून गेल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालय, सिंदखेडराजा येथे भेट देऊन तहसीलदारांना निवेदन दिले. सदर निवेदनामध्ये नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर शिवराज कायंदे, ज्ञानदेव खेडकर, प्रदीप जायभाये, प्रताप जायभाये, गैबी खेडकर, विठ्ठल कायंदे, श्रीकृष्ण कायंदे, विजय डोके, देवानंद डोळे, सतीश कायंदे व राजू जायभाये यांसारख्या शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचा हात देत पंचनामे करण्यात यावेत असे निवेदन देऊन शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे
