तेलंगणाहुन जळगावी येणाऱ्या बेपत्ता दाम्पत्याचा अखेर कार सह पती पत्नीचे मृतदेह आढळले विहिरीत…….

Screenshot_2025-11-30-13-28-23-53_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज )तेलंगणातील सीतापुरम येथून जळगावच्या पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा या आपल्या मूळ गावी लग्न समारंभासाठी निघालेल्या बेपत्ता दाम्पत्याचा अखेर शोध लागला . खामगाव ते मलकापूर मार्गावरील वडनेर भोलजी उड्डाणपुलानजीक झुडपांनी वेढलेल्या विहिरीत कारसह दाम्पत्याचा मृतदेह आढळला. पद्मसिंह दामू पाटील (४९) व त्यांची पत्नी नम्रता (४५) अशी या मयत दाम्पत्याची नावे आहेत.
याबाबत असे की, पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा येथील रहिवाशी असलेले पदमसिंग दामू पाटील हे तेलंगणा राज्यातील धोंडापाडू व्हीलेज (ता. चिपलम, जि. सूर्यपेठ) येथे झुआरी सिमेंट लि. या कंपनीत संचालक म्हणून नोकरीला आहेत. त्यांच्या मावस भावाच्या मुलीचे तसेच आतेभावाचे येत्या ३० नोव्हेंबर व ५ डिसेंबर रोजी लग्न आहे. त्यासाठी आठ दिवसांची सुटी काढून पत्नी नम्रतासह गुरुवारी (दि. २७) सकाळी सहा वाजता एम.एच. १३, बी.एन. ८४८४ या कारने जळगावकडे निघाले होते.

नियोजनानुसार ते रात्री १० वाजेपर्यंत लग्नस्थळी डोकलखेडा येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, रात्री १० वाजेपर्यंत पद्मसिंह पाटील हे पत्नीसह जळगावला न पोहोचल्याने कुटुंबियांची चिंता वाढली. काही वेळ वाट पाहिल्यानंतर संदीप पाटील यांनी पद्मसिंह यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा भ्रमणध्वनी बंद येत होता. त्यानंतर त्यांनी पद्मसिंह यांची पत्नी नम्रता यांना फोन लावला. परंतु त्यांचा फोनही बंद येत होता.
२७ नोव्हेंबरपासून नातेवाईकांनी सतत संपर्क करण्याचा आणि शक्य त्या सर्व मार्गांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाटील दाम्पत्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर तातडीने दाम्पत्याची शोध मोहीम सुरू केली. भ्रमणध्वनी लोकेशनच्या आधारे तपास करताना, पाटील दाम्पत्याचे शेवटचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव–मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडनेर भोलजी (ता. नांदुरा) गावाच्या परिसरात आढळले. भोलजी येथूनच त्यांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे पोलीस भोलजी गावाच्या परिसरात दाम्पत्याचा सगळीकडे शोध घेत होते. त्या कालावधीत महामार्गावर कुठेच अपघात घडलेला नसल्याने पोलिसांनी दाम्पत्याचा घातपात झाल्याचा संशय देखील व्यक्त केला होता.
दरम्यान, शोध कार्य सुरू असतानाच वडनेर उड्डाणपुलाजवळील महामार्गालगतच्या झाडा-झुडुपांनी वेढलेल्या एका विहिरीत शनिवारी दुपारनंतर कारसह पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर कारसह दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. उत्तरीय तपासणीनंतर दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले जातील. रविवारी दोघांवर जळगाव जिल्ह्यातील डोकलखेडा (ता.पाचोरा) येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पद्मसिंह पाटील आणि नम्रता पाटील यांच्या मागे १६ वर्षांची एकुलती मुलगी आहे.

You may have missed

error: Content is protected !!