घरांची दयनीय स्थिती, तरीही घरकुल मंजूर नाही नागरिकांची प्रशासनाकडे घरकुल नवीन मंजूर करण्याची मागणी
लोणार (यासीन शेख): शहरातील झोपडपट्टी भागांतील घरे सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून देखील संबंधितांना नवीन घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही ही खेदजनक बाब आहे. पन्नास वर्षांपूर्वी झोपडपट्टी योजनेतून मिळालेली घरे आता पूर्णपणे मोडकळीस आली आहेत. पावसाळ्यात घरांचे छत गळते, भिंतीला तडे गेले आहेत, कुठे घर कोसळण्याच्या स्थितीत आहे. तरीही प्रशासन नवीन घरकुल मंजूर करताना सरकारी जागा असल्याचे हे कारण पुढे करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.आम्हाला जुन्या घराचा दाखला दाखवला जातो, पण आज ती घरे राहत योग्य नाहीत. कुटुंबं मोठी झाली आहेत, अनेक ठिकाणी सहा-सात सदस्य एका खोलीत राहत आहेत, अशी व्यथा लाभार्थ्यांनी व्यक्त केली.नागरिकांनी यासंदर्भात मुख्याधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदन देत प्रशासनाने तत्काळ परिस्थितीची पाहणी करून नवीन घरकुल मंजूर करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा मोठा लोकआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी निवेदन देताना दत्ता भगत, एजाज खान, रहेमान नवरगाबादी, विलास ठाकूर, गब्बर चौधरी, अशोक गुजर, जहीर शहा, नवल जगदाळे,तानाजी मापारी, वसीम शेख, तोसिफ खान, ईरशद पठाण यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.
घरकुल योजना लाभ मिळावा यासाठी अनेक वेळा स्थानिक प्रशासन, नगरपरिषद व संबंधित खात्याकडे पाठपुरावा करूनही अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. यामुळे या लाभार्थ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहे. आम्हाला पन्नास वर्षांपूर्वी मिळालेले झोपडीचे अनुदान आता पुरेसे नाही, पण तरीही नवीन घरकुल मिळत नाही, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. यासंदर्भात प्रशासनाने योग्य त्या मार्गदर्शनासह न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
