चिखली तालुक्यातील युरियाच्या तुटवड्याला आळा घाला! — राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांची मागणी…
चिखली (एकनाथ माळेकर)शेतकऱ्यांना मका व कापूस पिकासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उपजिल्हा अध्यक्ष गजानन वायाळ यांनी ठोस पावले उचलली आहेत. खताचा मुबलक साठा असतानाही काही दुकानदार तो लपवून ठेऊन तुटवडा दाखवत असल्याचे लक्षात येताच त्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे तातडीने कारवाईची मागणी केली.
गेल्या काही दिवसांपासून चिखली तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांवर युरिया खत मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. त्यामुळे त्यांनी गजानन वायाळ यांच्याशी संपर्क साधला होता. यानंतर आज वायाळ यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी काही दुकानांमध्ये युरियाचा बंपर स्टॉक असल्याची माहिती मिळाली. मात्र दुकानदारांकडून विक्री न करता कृत्रिम तुटवडा निर्माण केल्याचे आढळून आले.
या पार्श्वभूमीवर गजानन वायाळ यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांशी थेट संपर्क साधत ज्या दुकानांमध्ये युरियाचा साठा आहे तिथे कृषी विभागाचे कर्मचारी नियुक्त करून त्यांच्या उपस्थितीत खतांची विक्री व्हावी, अशी मागणी केली. यामुळे युरिया जास्त दराने विकला जाणार नाही व सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळेल, असे त्यांनी सांगितले.
या वेळी मुलगी, मुरादपूर, चंदनपूर, काठोडा येथील शेतकरी तसेच बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पवार, विनायकराव साप्ते, दिलीप मामा शितोळे, प्रसाद पाटील, गोपाल गाडेकर व इतर शेतकरी उपस्थित होते.
