सोनोशी पुलावर वारंवार पूर; ग्रामस्थांना वाहतूक कोंडीचा मोठा फटकात्वरित उपाययोजना न झाल्यास शांततापूर्ण आंदोलनाचा इशारा
सिंदखेड राजा: (अनिल दराडे) मौजे सोनोशी येथील सोनोशी-राहेरी मुख्य रस्त्यावर असलेल्या पुलावर वारंवार पुरस्थिती निर्माण होऊन वाहतूक ठप्प होत आहे. मागील चार दिवसांत दोन वेळा या पुलावरून पूर गेल्याने वाहनचालक, प्रवासी, शाळकरी मुले, शेतकरी व शेतमजुरांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.दिनांक ६ ऑगस्ट व ९ ऑगस्ट रोजीचे व्हिडीओ यासंदर्भात चर्चेत आले आहेत. पहिल्या घटनेत पाण्याच्या प्रवाहात अडकलेली एक गाडी गावातील दोन तरुणांनी जीव धोक्यात घालून सुखरूप बाहेर काढली. दुसऱ्या घटनेत मात्र अनेक शाळकरी मुले, शिक्षक, शेतकरी व प्रवासी पुलावरच अडकून पडले.ग्रामस्थांच्या मते, गावात केवळ एक तास पाऊस झाला तरी या पुलावरून दोन तास वाहतूक थांबते. पुलाची उंची कमी असून, बोगद्यात साचलेल्या घाण व गाळामुळे पाण्याचा निचरा थांबतो. त्यामुळे पाणी थेट पुलाच्या वरून वाहते आणि जीवितास धोका निर्माण होतो.“प्रशासनाने पुलाच्या समस्येकडे गांभीर्याने पाहून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, जेणेकरून नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर होईल,” अशी मागणी सोनोशीचे शिवानंद गजानन आघाव यांनी केली आहे.दरम्यान, सोयंदेवच्या सरपंच जयश्री दीपक कायंदे यांनी सांगितले की, “दरवर्षी पावसाळ्यात सोयंदेवसह दहा ते अकरा गावांतील नागरिकांना या पूरस्थितीचा गंभीर त्रास सहन करावा लागतो. संबंधित विभाग फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. जर त्वरित ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर ग्रामस्थांना कायद्याच्या चौकटीत शांततापूर्ण आंदोलन करावे लागेल.”ग्रामस्थांच्या या इशाऱ्यामुळे प्रशासनावर तातडीने कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे.
